Wednesday, September 23, 2020

दिल दोस्ती दुनियादारी


दिल दोस्ती दुनियादारी

एक तरुण मालिका झी मराठीने प्रेक्षकांसमोर आणली होती. ती मालिका म्हणजे- ‘दिल दोस्ती दुनियादारी’! खास तरुणांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या या मालिकेने तरुणांची मने तर जिंकलीच सोबतच इतर वयोगटातील प्रेक्षकांना देखील आपलेसे केले होते.

मुंबई ....स्वप्नाची नगरी.इथे अनेक तरुण-तरुणी आपली स्वप्न घेऊन येतात स्वतःचे घरदार सोडून.स्वप्नाचा पाठलाग करणारे हे बॅचलर मग हक्काचे घर शोधू लागतात परंतु बॅचलरना घर सहजासहजी कोणी देत नाही.मग त्यांनाच एकत्र येऊन स्वतःचे कुटुंब,स्वतःचे माजघर तयार करावे लागते आणि मालिकेची सुरवात ह्याच टप्यावर होते.आणि मग आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा, मीनल आणि अँँना एकत्र येऊन माजघर(माझं घर) तयार करतात.आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा, मीनल आणि अँँना ही मालिकेतील सर्वच पात्रे प्रत्येकाच्या ओळखीची झाली होती, जणू कुटुंबातील सदस्यचं झाली होती म्हणा ना! करियरची स्वप्ने मनात घेऊन घरापासून दूर येत स्वतंत्रपणे राहणाऱ्या या मित्रांची कहाणी प्रत्येक प्रेक्षकाला भावली.घरच्या घरपणाला व कुटुंब प्रेमाला मुकलेलं हे सर्वजण आपले एक कुटुंब निर्माण करतात.आणि आनंदाने राहतात.

त्यांचे खोडकर किस्से, लहान सहान प्रसंगातून निर्माण होणारे हास्याचे फवारे आणि कधी कधी अंतर्मुख करायला लावणारे विचार या सर्वांची एक अविस्मरणीय मेजवानी या मालिकेने दिली होती. ही मालिका अशीच अविरत सुरु राहावी असे चाहत्यांना वाटत असताना लिमिटेड एपिसोडसमुळे(२९८) अचानक मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अल्पावधीतच ही मालिका तरुणाच्या गळ्यातील ताईत झाली.

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले, वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून, वेगवेगळी स्वप्ने घेऊन मुंबईत पोचलेले हे सहा जण आणि त्यांच्या सहजीवनातून निर्माण होणारे प्रसंग असे या मालिकेचे स्वरूप होते.आपल्या प्रश्नांवर मित्रांच्या मदतीने सदैव तोडगा काढणारे हे सहा जण नेहमीच आपल्या मनाला भावले. हया सहा जणांच्या मैत्रीचा नेहमीच हेवा वाटला.दिग्दर्शकाने मालिकेचा केलेला शेवट अगदी समर्पक वाटला. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले.मालिकेची कथा संजय जाधव व आशिष पाथरे ह्यानी उत्तम लिहिली होती.

असे रूममेट्स किंवा असे मित्र सर्वांनाच मिळाले पाहिजे असे वाटते ही मालिका बघितल्यावर.ही मालिका जेवढी आपल्याला हसवते तितकीच रडवते सुद्धा.अंतर्मुख करायला लावते ही मालिका.बॅचलर मुले व मुली एकत्र गुण्यागोविंदाने नांदताना बघून मनाला खूप समाधान लाभले.मालिकेतून सतत उत्तम संदेश देण्याचा दिग्दर्शकचा कल दिसून आला.मालिकेतून हाताळलेले विविध विषय उत्तमच होते.

सुव्रत जोशी - सुजय साठे (स्कॉलर,एक मिनिट काका)

अमेय वाघ - कैवल्य कारखानीस (सायको,गब्बू)

पुष्कराज चिरपूटकर - आशुतोष शिवलकर (आशू,उधारी किंग)

पूजा ठोंबरे - ॲना मॅथ्यूज (ससा,इनोसंट फुल्ल)

स्वानंदी टिकेकर - मीनल शेवाळे (लेडीडॉन,अभिनेत्री)

सखी गोखले - रेश्मा पाटील-इनामदार (जगतजननी,अन्नपूर्णा)

ह्या सर्वांचा अभिनय उत्तम होताच परंतु राकेश, प्रगल्भा,किंजल, नागावकर,सॅम,निकम आजी ह्यांचा अभिनयसुद्धा उत्तम होता.

दिल दोस्ती दुनियदारी मालिकेच्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आम्हा प्रेक्षकांना निखळ आनंद दिल्याबद्दल!!!

- सुयश गावड

दिल दोस्ती दुनियादारी शीर्षकगीत

दुनिया ही रंगबिरंगी आपल्या वेड्या स्वप्नांची
मैत्रीत ह्या… मैत्री ह्या..
बंधन नाही नात्यांचे
तरी बंध हे जन्मभराचे
मैत्रीत ह्या… मैत्रीत ह्या..
जगण्याची रीत ही भारी
दोस्ताना सावरणारी
जोडणारी.. जोडणारी..
दिल दोस्ती दुनियादारी
दिल दोस्ती दुनियादारी
दिल दोस्ती दुनियादारी
दिल दोस्ती दुनियदारी

- अमोल पाठारे

क्षण हे सोनेरी आठवणी चंदेरी
जगणे सुंदर हे वेचुया चला
गाणे मैत्रीचे रंगीत नात्याचे
पडता मी सावरा चला
रडता मी आवरा मला
नसता तू दे होश साथिया
असता तू बेहोष साथिया
घडले ते विसरून जाऊया
स्वप्न नवी ही बिनधास पाहूया
चढू दे यारीची आगळी नशा
ढळला तोल तरी शोधूया दिशा
जीवास लाभली साथ ही तुझी
जगणे झाले जल्लोष साथिया

- आशिष पाथरे

Tuesday, September 22, 2020

भोरप्याचा ईमानी बल्लाळ


भोरप्याचा ईमानी बल्लाळ

माझा फेसबुक मित्र सूरज उतेकर ह्याचे भोरप्याचा ईमानी बल्लाळ हे पुस्तक नुकतेच वाचले.छोटेखानी पुस्तक मनाला खूपच भावले. ह्या कादंबरीतील जिवा व धोंड्या ही पात्र मनाला भावली.ही कादंबरी धोंड्या ह्या पात्रावर विशेष करून आधारित आहे.ही दोन्ही पात्र काल्पनिक असली तरी लेखक सूरज उतेकर म्हणतो की भोरप्याच्या सानिध्यात अनेकवेळा ही पात्र भेटली आहेत.२०१० साली जेव्हा लेखकाने पहिल्यांदा भोरप्या पाहिला होता अगदी त्याच रात्री लेखकाची आणि धोंड्याची भेट घडली होती असे लेखक आवर्जून सांगतो.आणि ह्याच टप्प्यावर लेखक धोंड्यावर कादंबरी लिहायचे निश्चित करतो आणि त्याला जसा भावला तसा धोंड्या आपल्यासमोर अश्यापद्धतीने त्याने साकारला.

निसर्गाच्या प्रत्येक घटकांकडे बघण्याची लेखकाची दृष्टी व निसर्गतःच लाभलेले कवी मन ह्यांमुळे लेखकाच्या नजरेतून किंवा त्याच्या सहज सुंदर लेखनशैलीतून धोंड्या हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभा केला आहे.शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आपली महाराष्ट्र भूमी. ही सहयाद्री भूमी. ज्यात हे गड कोट म्हणजे आपला सन्मान आपला सर्वोच्च अभिमान. लेखक मुळातच गिर्यारोहक असल्याकारणाने त्याने खूप सुंदर वर्णन केले आहे भोरप्याचे.

पालीच्या बल्लाळेश्वरावर अपार श्रद्धा असलेली रकमाई…(धोंड्याची आई)त्याचाच स्वराजाला लाभलेला प्रसाद म्हणून आपल्या पहिल्या  मुलाचं नाव बल्लाळ ठेवते आणि प्रेमानं त्याला धोंड्या म्हणू लागते. धुंडीविनायकाची आपल्यावर अपार माया असल्याचे तिला वाटे म्हणून धोंड्या म्हणू लागली. यानंतर संपूर्ण ठाकूरवाडी त्याला धोंड्या म्हणूनच हाक मारू लागते.

असा हा धोंड्या..लहानपणापासूनच खूप प्रश्न विचारणारा,निसर्गाची आसक्ती असणारा,रानावनात बिनधास्त मोकाट बागडणार,निसर्गाशी कौतुकाने सवांद साधणारा,शिवाजी महाराजांबद्दल अपार प्रेम व आदर असणारा,त्यांच्या स्वराज्यात मावळा होण्याचं स्वप्नं उराशी बांधून असलेला,जिवाचा जिवलग असणारा, स्वप्नात पण शिवाजी राजाचं दर्शन घेणारा,दरोडेखोरांशी प्राणपणाने लढणारा,भोरप्याच्या मातीत चिरशांती घेणारा,भोरप्याच्या सानिध्यात स्वतःच्या पराक्रमाने वीरगळ घडवून घेणारा

धोंड्या...असा तसा धोंड्या नाही....सह्याद्रीचा धोंड्या..भोरप्याचा धोंड्या

लेखकाने खूप सुंदर अभंग व संस्कृत श्लोक ह्या कथेमध्ये वापरले आहेत त्यामुळे कथेचे सुशोभीकरण झाले आहे असे मला वाटते.धोंड्याच्या आईने म्हणजेच रकमाने धोंड्यासाठी यशोदेवर गायलेले गाणे मनाला स्पर्शून जाते.

माझ्या यशोदेचं जीनं
जीनं कुनाला कळेना
बाळ लुचतं छातीला
तिचा पाझरितो पान्हा.
सावलीत यशोदेच्या
वाढी देवकीचा तान्हा
माझ्या यसोदेचे जिन
जिंन कुनाला कळना.

असा हा धोंड्या आपल्या मनात घर करून राहतो कायमचा. सुधागडला आपण गेलो की आपल्याला धोंड्या भेटावा असे जर मनापासून वाटत असेल तर नक्की भोरप्याचा ईमानी बल्लाळ ही कादंबरी वाचा.

सूरज मित्रा खूप धन्यवाद !!!धोंड्याची ओळख करून दिल्याबद्दल.उत्तरोत्तर अश्याच छान छान कादंबऱ्या लिहीत राहा.तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!

- सुयश गावड

Friday, September 4, 2020

आरे कॉलनीत प्राणिसंग्रहालय स्तुत्य उपक्रम

श्राद्ध


श्राद्ध

स्वतःसाठी शर्ट घेऊ असं
बापाने मनाशी पक्कं केलं
लेकाच्या वाढदिवसाचं मनात येताच
शर्टाच्या विचारांचं *श्राद्ध* घातलं

आई दिवस रात्र राबताना
लेकरू तापाने फनफनलं
डोळ्यावरची झापड दूर सारून
आईने झोपेचं *श्राद्ध* घातलं

फाटकी बॅग पाठीला लावून
बाबाने नव्या बॅगेचं स्वप्न पाहिलं
लेकाच्या कॉलेजच्या खर्चापुढे
बाबाने बॅगेचं *श्राद्ध* घातलं

नेहमीच्या पाठदुखीने आई त्रस्त
मन वॉशिंग मशीन मध्ये रमून गेलं
लेकाच्या हट्टाच्या मोबाईलपुढे
आईने वॉशिंग मशीनचं *श्राद्ध* घातलं

बाबांची चप्पल पुरती झिजली
बुटांनी मनात घर केलं
लेकाच्या स्पोर्ट्स शूज साठी
बाबांनी बुटांचं *श्राद्ध* घातलं

आता बाप असतो वृद्धाश्रमात
आईने केव्हांच जग सोडलं
लेकरांच्या भविष्यासाठी
जीवनाचं असं *श्राद्ध* घातलं

एके दिवशी लेक असा
पिठाचे गोळे करीत होता
यातनेच्या जीवनाच्या पिंडाचे
रुबाबात *श्राद्ध* घालीत होता

पानाच्या तुकड्यावर घास ठेवून
का-का करीत तो उभाच होता
आई बापाच्या जगण्याचं *श्राद्ध*
मृत्यू नंतर घालीत होता

कुठूनशा दोन कावळ्यांनी
हासत हासत पिंडाला शिवलं
मृत्यूनंतरही लेकराच्या आनंदासाठी
आत्मसन्मानाचं त्यांनी *श्राद्ध* घातलं

- संतोष कृष्णा राणे

बाईमाणूस

बाईमाणूस

आपण दोघांनी मिळून उठायचं
माझं तुझं न करता सारी काम करायची
मी स्वयंपाक करत जाईन
तू स्त्री असल्याचा "समाजआव" आणत
मधेमधे घुटमळायचं नाही ...
आपला एखादा बबडी-बबड्या असेल
त्याच अंघोळ ,धुणं, पाणी मीच करणार
तू धन्यवाद म्हणायचं नाही
वेडे! तो तुझा नाही
आपला आहे...
मी दमल्यावर तू माझे पाय दाबत जा
तू दमल्यावर मी तुझे पाय दाबत जाईन
पण तू ही दमत जा
सहनशीलता सोडून ...
लग्नानंतर तू तुझं नाव आडनाव बदलायचं नाही
तू सासरी राहायचं नाही
मी माहेरी राहणार नाही
तुझ्या आणि माझ्या आईवडिलांना घेऊन
आसरा असणाऱ्या घरी आपण राहायचं...
तू सुई हो
मी धागा होतो
तू धागा हो
मी सुई होतो
पितृसत्तेच्या साड्या फाडून
समतेची गोधडी आपण शिवू ...
तुझ्या मैत्रिणींसारखं तुझ्या मित्रांनाही
खुशाल घरी आण
आपला सोन्यासारखा संसार दाखवायला
मी चहा घेऊन तयार असेनच!
तेव्हा ते आपापसांत
मला बायकी,बायल्या
अशा बिरुदावल्या लावतील
आणि तुला पुरुषी,मर्दानी
अशा पदव्या देतील
भिऊ नकोस , घाबरू नकोस
तेव्हाच आपलं माणूसपण  सिद्ध होईल...

- नितीन जाधव
         

आईचा जन्म

आईचा जन्म

रखरखत्या उन्हात
काळया रानात
चक्कर येऊन पडलेल्या आईला
बाया घरी आणतात
पोराच्या हवाली करून
निघून जातात

सरकारी दवाखान्याच्या गोळीवर
सुरू होतो तिचा उपचार

तसं नेहमीच दुखत असतं तिचं
डोकं, पाय अथवा गुडघा
प्रत्येकवेळी ती सांगतेच
असं नाही

सताड डोळं उघडं ठेऊन
पोरगं दाबतं तिचं डोकं

कूस बदलताना
ती कण्हते
शक्य तितक्या कमी आवाजात

तरी त्याला आवाज जातोच
कुठल्यातरी कोपऱ्यात
गुडघ्यात पाय घालून
तो धुसफूसत राहतो
तासनतास

हल्ली
तिनं जेवण केल्याशिवाय
तो घासाला धक्का सुद्धा लावत नाही
तिच्या गोळ्या - औषधं
याकडं लक्ष असतं त्याचं
मिनिटामिनिटाला
तो तिला समजावाय लागलाय
तो तिची काळजी कराय लागलाय

त्या सारवलेल्या भुईवर
कोपऱ्यात
एका आई शेजारी
' काळजाच्या गर्भाशयातून '
दुसऱ्या आईचा जन्म होतोय...

- नितीन जाधव 

उष:काल

उष:काल

क्षितिजावरती उजळून आल्या रविकिरणांच्या वाती
काळोखाने धरेस दिधले उष्ण नभाच्या हाती
स्थिरावलेले चक्र पुन्हा बघ वेगे लागे धावू
निर्माणाची पवित्र गीते एकमुखाने गाऊ

उठला चाफा, जुई,मोगरा, बदलून झाल्या कुशी
निजून उठल्या सुमनदलांनी पुन्हा उघडली शिशी
घराघरातून ऐकू येती ओव्या,अभंगवाणी
गृहलक्ष्मी मग उभी राहते सरसावूनिया पाणि

चंदनल्याल्या देवघरातून प्रसन्न भासे राम
क्षणभर वाटे त्वरे फिरूनी आलो चारीधाम
चराचरातील मांगल्याने बहरून आली वाट
प्रभा असे की सरस्वतीचा वात्सल्याचा हात!

- सौरभ पाटील

Thursday, September 3, 2020

सर पावसाची आली

सर पावसाची आली.....

काळ्या ढगानं आभाळ भरलं
थेंब अमृताचं धरतीवर सांडलं
कशी अवनीवर हिरवाई पसरली
सर पावसाची आली....

सुर्या देवाचं दर्शन होईना
जणू आभाळास फुटला पान्हा
सर्व सृष्टीची तहान सरली
सर पावसाची आली.....

इंद्रधनुची सजली कमान
हरवून जातयं आपल भान
शुद्ध आत्ता सारी हरली
सर पावसाची आली....

वरूणदेवाचं हे सुंदर वरदान
तृप्त धरणी दिसते छान
कणांकणांतून सृष्टी गहिवरली
सर पावसाची आली....

- सुयश गावड

Wednesday, September 2, 2020

नवं कवी सौरभ पाटील

नवं कवी सौरभ पाटील

सौरभ पाटील...ह्याला मी पहिल्यांदा कवितेवर प्रेम करण्याऱ्या मधुराणी गोखले-प्रभुलकर ह्यांच्या कवितेचे पान ह्या कार्यक्रमात पाहिले व त्याच्या कविता,गझल ऐकल्या.त्याच्या कविता व गझल ऐकून मी फारच भारावून गेलो.आजकालचे नवं कवी म्हणजे ते मुक्त छंदातच लिहिणार असा समज असलेल्याला मला पार चुकीचे ठरवले ह्याने.शिक्षणाने इंजिनियर असणारा हा छंदात,वृत्तात कविता करतो हे बघून फार अप्रूप वाटले ह्याचे. गझल, रुबाई  हे काव्यप्रकार तर ह्याच्या विशेष आवडीचे.काय सुंदर गझल लिहितो हा.ह्याच्या कविता व गझल माझ्या मनाला फारच भावल्या म्हणून ह्या नवं कवीला फेसबुकवर हुडकून काढले आणि मेसेज करून सांगितले की तुझ्या कविता व गझल मला खूप आवडल्या.तर ह्या पठयाचा लगेच रिप्लाय आला मग आमच्यात खूप गप्पा झाल्या.मी त्याच्याकडे त्याचा मोबाइल नंबर मागितला आणि त्याने तो लगेच दिला मला.मी त्याला म्हंटले तुझा कवितासंग्रह वैगरे आहे का?तर तो लगेच उत्तरला नाही खूप वेळ आहे त्याला,एवढ्यात कुठे?अजून कविता, गझल शिकतो आहे.हे ऐकून तर माझी खात्रीच झाली की हा down to earth categoryमधला आहे.त्याच्या कवितेस ह्या कार्यक्रमाचा एकच प्रयोग झाला आणि पुढचे नियोजित प्रयोग लोकडोउनमुळे होऊ शकले नाही परंतु ह्या कार्यक्रमाबद्दल फेसबुकवर खूप चांगल्या प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या.आणि मी त्याला सांगितले की तुझ्या पुढच्या कार्यक्रमाचा प्रयोग कधी असेल ते सांग मला मी जरूर येईन बघायला.आणि पुण्यात कधी आलो तर आपण नक्की भेटू.अत्यंत साधा,लाघवी आणि तेवढाच innocent वाटला.आणि हेच सर्व प्रतिबिंब त्याच्या कविता व गझलमध्ये आपल्याला दिसून येते असे मला आवर्जून वाटले.

मित्रा अश्याच सुंदर आणि छान छान कविता,गझल लिहीत राहा.सदैव असाच हात लिहिता ठेव.तुझ्याकडून अजून खूप कविता,गझल ऐकायच्या आहेत.

तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!

- सुयश गावड


उष:काल

क्षितिजावरती उजळून आल्या रविकिरणांच्या वाती
काळोखाने धरेस दिधले उष्ण नभाच्या हाती
स्थिरावलेले चक्र पुन्हा बघ वेगे लागे धावू
निर्माणाची पवित्र गीते एकमुखाने गाऊ

उठला चाफा, जुई,मोगरा, बदलून झाल्या कुशी
निजून उठल्या सुमनदलांनी पुन्हा उघडली शिशी
घराघरातून ऐकू येती ओव्या,अभंगवाणी
गृहलक्ष्मी मग उभी राहते सरसावूनिया पाणि

चंदनल्याल्या देवघरातून प्रसन्न भासे राम
क्षणभर वाटे त्वरे फिरूनी आलो चारीधाम
चराचरातील मांगल्याने बहरून आली वाट
प्रभा असे की सरस्वतीचा वात्सल्याचा हात!

- सौरभ पाटील

आरंभ दिसे ना दिसे कशाचा अंत
आक्रोश मनाचा निजून गेला शांत
ही पहाट कसली जिला न सुटते रात
का दिवस सांगतो रोज तमाची बात

पाऊल टाकता दिसे किर्रर काळोख
प्रत्येक दिशेची झाली येथे राख
पूर्वेस निघालो तिथे द्यायला हाका
जोरात हासली गूढ खिन्नता एक

हे भयाण आहे कसा सुटू मी सांग?
मेंदुत स्फोटके लावून बसली रांग
मी स्वतः पेटवुन देइन त्यांना म्हणतो
हे म्हणतो, कण्हतो, नुसता कण्हतो म्हणतो!

थांबून जरा मग पाहत बसलो वाट
पारावर झाली नशिबासोबत भेट
ते माझ्या हाती चाळून म्हणले काळा,
" मी तुझ्या नशिबी कधीच नव्हतो बाळा!"

- सौरभ पाटील

कुणा काय सांगू? कुणासाठी भांडू?
कुणावरती लावू मी पैजा आता?
नभालाच बरसायचे नाही इथे तर,
धरा काय सांगे बहाराची कथा?
जया ओढ ज्याची तो तिकडेच जातो
तरी जीव माझा तुझ्याशीच अडे,
मला उत्तराची जरा ना अपेक्षा
तुझी कारणे ठेव तुझियाकडे!

तुझे मौन प्यालो, दिल्या दुःखी न्हालो,
अजून काय सुख ते मला सांग ना?
तुझी तू किनाऱ्यास बिलगून होतीस
मला कोठला पैल अन थांग ना!
खलाशी कधी का दर्यास भ्याला
जरी नाव तुटली न फाटली शिडे?
मला उत्तराची जरा ना अपेक्षा,
तुझी कारणे ठेव तुझियाकडे!

- सौरभ पाटील



Tuesday, September 1, 2020

चिमटीत पकडून ठेवायचंय खूप काही

चिमटीत पकडून ठेवायचंय खूप काही

शब्द, त्यांचे नेमके अर्थ
स्पर्श, त्यांचे नेमके अर्थ
सगळंच निसटून जायच्या आधी
घट्ट धरून ठेवायचंय खूप काही.

देहावरच्या खुणा, अस्पष्ट
मनावरच्या खुणा, जरा जास्तच स्पष्ट
बुद्धी फार काम करायला
लागायच्या आधीच
गोंदून घ्यायचंय खूप काही.
माझा श्वास, तुझ्यात गुंफण
तुझा श्वास, माझ्यात रिंगण
सवय ‘व्यसन’ बनण्याआधीच
सोडवून घ्यायचंय खूप काही.
मोकळं व्हायचंय..बेभान जगायचंय
होऊन द्यायचंय खूप काही..!!

- स्पृहा जोशी

सावळबाधा

सावळबाधा

अलवार वाजवित वेणू
तो स्वप्नफुलांवर आला
अन रंग सावळा माझ्या
डोळ्यांवर सोडून गेला. .
क्षितिजावर निळसर रेघा
गोंदून जराश्या हलक्या
सांजेचे लेऊन पंख
तो कृष्ण किनारी आला. . .
मी तिथेच होते तेंव्हा
थांबले मंदिरापाशी
तो सोनखुणांचे पाऊल
वाळूवर उमटत आला. . .
भरजरी शुभ्र वस्त्रांवर
नाजूक कशिदा त्याच्या
हातात कडे सोन्याचे
मनमोहन लेऊन आला. .
बैसला जरा बाजूला
मंदिरी पायरीपाशी
डोळ्यात पाहुनी माझ्या
डोळ्यात हरवुनी गेला. . .
हातात घेऊन हात
मज म्हणे, सखे जाऊया. !
मी लाजून हसता गाली
गालांवर उमटत गेला. . .
मज झाली सावळबाधा
मी झाले ना रे राधा. . ?
तो ऋतू जीवघेणा पण,
स्पर्शात शहारून गेला. . .
ती शामनिळाई ल्याली
वेगळीच होती सांज
तो कातरवेळी ऐसा
मोरपीस फिरवून गेला. . .
मी ओढून घ्यावा म्हणून
जाताना माझ्यासाठी
कालिंदीच्या काठावर
तो शेला विसरून गेला. . .

- पूजा जगदीश भडांगे लगदिवे 

नवरा वारल्यावर


नवरा वारल्यावर

अकाली नवरा वारल्यावर
काय करावं त्याच्या वस्तूंचं,
सामाना-सुमानाचं ?
ठेवणीतले कपडे, शर्ट-पॅन्ट वगैरे
गरिबाला देऊन टाकावेत
किंवा घ्यावी भांडी बोवारणीकडून
तरी उरतोच प्रश्न त्याच्या अंडरविअरचा

मोबाईल येईल वापरता
सिमकार्ड बदलून
पण काँटॅक्ट लिस्टमधले
कलीग्जचे, मित्र-मैत्रिणींचे नंबर्रस्
करावे डिलीट की असू द्यावेत
तांदळातील गारीसारखे ?

त्याने फ्रिजमध्ये ठेवलेले
बिअरचे कॅन्स रिचवावेत एकटीने
उरलेल्या कडू आयुष्यासारखे
की ओतून कराव्यात फ्लश
सतत फेसाळणार्‍या आठवणी

गेल्या सात-आठ वर्षांत
डबलबेडवर एकाच बाजूला
लागलेली झोपायची सवय मोडता येईल
त्याची उशी नजरेआड करून ?

वर्षानुवर्ष त्याने लिहिलेल्या डायर्‍यांना
त्यात नोंदवलेल्या स्वप्नांना,
इच्छांना, आकांक्षांना
रद्दीत असा कितीसा मिळेल भाव ?

तो गेल्या दिवसाच्या आदल्याच रात्री
बंद पडलेलं रिस्ट वॉच
सांभाळावं उराशी
गरज नसलेल्या सहाव्या बोटासारखं ?

त्याच्या चपला द्याव्यात फेकून
की वाट पहावी
मुलाला त्या येतील याची ?

अर्धवट वाचून झालेल्या
कादंबरीच्या कुठल्याशा पानावरून
माझ्याकडे पाहणारा त्याचा चष्मा
ठेवावा मिटून
की सतत अनुभवावी जाणीव
तो पाहत असल्याची ?

हे मंगळसूत्र ठेवावं काढून
की ढाल म्हणून बाळगावं
परपुरूषांविरोधात
ओशटलेल्या नजरांपासून बचावाकरता ?

त्याच्याऐवजी मी जर गेले असते
तर त्याने दिले असते फेकून
हे शिल्लक राहिलेले काँडम्स ?

- गीतेश गजानन शिंदे 

बळ


बळ

झोकून देताच ट्रेनसमोर
झाला सावलीचाही चेंदा-मेंदा,
चढला रुळांवर
विखुरलेल्या स्वप्नांचा थर

छतावरून मारली उडी
भिनला अस्तित्वाचा वारा
करुन चिंध्या-चिंध्या
देहाचा पारा

कोंडला श्वास,
पंख्यासोबत राहिलो नुस्ताच भिरभिरत
ठरला निव्वळ भास

पिऊन किटकनाशक
पडलो पालथा
झाडले हातपाय झुरळासारखे
केली असहाय्य धडपड,
नाही थांबली पडझड

झोपेच्या गोळ्यांची बाटली
केली झोपेतच उपडी
तेव्हाही केला स्पर्श जीवनाला
खेळत मृत्युशी लंगडी

कापली शीर मनगटाची
उसळलंच नाही रक्त
उघडा झाला
मनावरील व्रण फक्त

राहिलो उभा काठाशी
तिथेही अधिकच भासला
तुझ्या आठवणींचा तळ
नाही होत माझ्यातल्या तुला
संपवण्याचं बळ

-  गीतेश गजानन शिंदे

अनामवीरा

अनामवीरा

अनामवीरा,जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात
धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा

– कुसुमाग्रज

गावची जत्रा


गावची जत्रा

माझे गाव पालघर जिल्हातील वडराई.आमच्या गावचे ग्रामदैवत कालिका माता आहे.तिला मोठी बाय(म्हणजे मोठी बाई किंवा मोठी आई)असे म्हणतात.तिचे जुने व नवीन अशी दोन मंदिरे आहेत बाजूबाजूला. खूप जागरूक देवस्थान म्हणून तिची पंचक्रोशीत प्रसिद्धी आहे.सर्वच जातीतील लोकांसाठी ही देवी खास आहे.ह्या देवीचा वार्षिक जत्रोत्सव चैत्र महिन्याच्या अमावस्येला दोन दिवस असतो. पहिल्या दिवशी देवीची षोडोपचार पद्धतीने पूजा करून होम प्रज्वलीत केला जातो व जत्रेला सुरुवात होते.लहानपणीपासूनच जत्रेचे विशेष आकर्षण असल्यामुळे दरवर्षी जत्रेला जाणे होतेच पण एखाद्या वर्षी जत्रेला जाणे नाही झाले तर खूप वाईट वाटायचे.नोकरीधंदयाच्या निमित्ताने गावाबाहेर गेलेली माणसे जत्रेसाठी येतात, त्यामुळे घरोघरीही माणसांची वर्दळ असते. त्यामुळे अनेकांनी नोकरी-व्यवसायासाठी गाव सोडले तरी मोठी बायवरचा त्यांचा विश्वास मात्र कमी झालेला नाही. हे सारे गावकरी देवीच्या उत्सवाला वेळात वेळ काढून उपस्थित राहतात. मीही त्याला अपवाद नाही.ह्या जत्रेच्या काळात लहान असताना खूपजण पैसे दयायचे आम्हाला, त्यातूनच आम्ही जत्रेत खर्च करत असू. खूप मज्जा यायची.जत्रा’ हा शब्द नुसता उच्चारला ना तरी अजूनही माझं मन फुग्यासारखं होऊन जातं. हलकं हलकं पाय जमिनीवरून निसटतात आणि आभाळाच्या दिशेने धावू लागतात.फक्त ‘जत्रा’ या दोन अक्षरी शब्दात ही किमया आहे.आमच्या गावची जत्रा उन्हाळ्याच्या सुट्टीत येत असल्याने परीक्षा संपलेल्या असायच्या.
 
जत्रेच्या काळात नव्याने रंगरंगोटी करून नटूनथटून देवालय आपल्या भक्तजनांसाठी उभे असते. रात्रीच्या वेळी मंदिरावरील झगमगत्या दिव्यांचा प्रकाश दूरवर पसरतो. गावातील उत्साही तरुण देवालय आणि त्याचा परिसर पताकांनी सुशोभित करतात. बघता बघता त्या आवारात दुकानांच्या राहुट्या पडतात. मानवी जीवनातील विविध अंगांचे दर्शन ही दुकानेच घडवीत असतात.जत्रेच्या माध्यमातून आपल्याला त्या गावची व त्या गावातील लोकांच्या संस्कृतीचे दर्शन घडते असे मला वाटते.
देवीच्या ओटीसाठी खण, नारळ, फूले, हळदकुंकू विकणारी दुकाने, प्रसादाचे विविध पदार्थ असणारी मिठाईवाल्यांची दुकाने ती देवालयाला चिकटून असतात. त्यांच्या शेजारी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू, बांगड्या, शोभेच्या वस्तू, तयार कपडे, झटपट फोटो काढून देणारी अशी अनेक दुकाने रांगेत बसलेली असतात. जत्रेच्या दिवसांत रात्रंदिवस ती दुकाने माणसांनी फुललेली असतात. त्यात आकड्यावर बाण मारण्याचा जुगार शिकविणारी दुकानेही असतात लाकडी रिंगा फेकून आपले नशीब आजमावणारी अनेक दुकाने असतात. तसेच फुग्यावर नेम धरणारे नेमबाज पण खूप असतात. जत्रेच्या निमित्ताने पाळणे, गोल फिरणारी चक्रे,छोटी झुक झुक गाडी येतात व अनेक हॉटेलेही उघडतात,जिथे आपल्याला उसाचा रस,अनेक प्रकारची आईसक्रीम (जत्रा फेमस चोकोबार, कुल्फी),भुजिंग(चिकन तंदुरी),खिमा पाव,कबाब,जिलेबी अश्या अनेक पदार्थावर ताव मारता येतो.

हलवाईची अनेक दुकाने जत्रेमध्ये असतात त्यांच्याकडे मिळणारी शेव बुंदी,खाजा, मक्याचा चिवडा, पेढे, बर्फी, सुतारफेणी, चणे,फुटाणे, हलवा,सोनपापडी ह्या सर्व पदार्थांची चव अप्रतिम असते.खूप सुंदर पद्धतीने ही मिठाई मांडली जाते.ह्या हलवाईच्या दुकानात खूप मोठाले आरसे लावले जातात त्यात आपल्याला स्वतःला न्याहाळाणात वेगळी गम्मत वाटते.जत्रेत मिळणारी प्लास्टिकची व कागदाची फुले मन मोहून घेतात.लहान मुलांसाठी जत्रेत विविध प्रकारच्या खेळण्याची दुकाने असतात.आमच्या लहानपणी जत्रेत पिपाणी,रंगीबेरंगी पिसांची टोपी आणि पाण्याचे फुगे मिळत असे.लहान असताना जत्रेत मी न चुकता ह्या सर्व गोष्टी आवर्जून घेत असे.

कालिका मातेची जत्रा असल्यामुळे बळी हा प्रकार आलाच. देवीच्या जुन्या मंदिराशेजारी एक माडाचे झाड आहे(अजूनही आहे)त्या माडाखाली बोकड्याचा आणि कोंबड्याचा बळी दिल्या जायचा.आमच्या लहानपणी हे बळी देण्याचे प्रमाण खूप होते आत्ता त्यामानाने हे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे.नवस केलेल्या बोकडाची वाजत गाजत मिरवणूक काढून नंतर त्याचा बळी दिला जायचा हे आम्ही लहानपणी बघितले होते परंतु आत्ता समाजप्रबोधन करून हे प्रमाण कमी झाल्याचे बघून खूप बरे वाटते.

देवीचा होम प्रज्वलीत केल्यावर भाविक त्यामध्ये नारळ व सुट्टे पैसे टाकतात.लहानपणी आम्ही जत्रा संपल्यावर ह्या होमातील ते पैसे काढण्यासाठी जात असू.पुढे जत्रा संपली तरी होम ३-४ दिवस पेटत असे.एकेवर्षी असेच पैसे काढताना ५० पैश्याचे नाणे माझ्या उजव्या हाताच्या तळभागावर चिकटले होते व मला खूप जबरदस्त चटका बसला होता.पुढे किती तरी दिवस ती जखम बरी झाली नव्हती ते चांगलेच माझ्या लक्षात आहे. ही आठवण कायम माझ्या मन पटलावर चांगलीच ठासली गेली आणि प्रत्येक वर्षी होणाऱ्या जत्रेच्या वेळेस ती परत ताजी होते आठवण.

लहान असताना दर दोन तासांनी आम्ही सर्व भावंडे जत्रेत जात असू.किती दुकाने आली आहेत,जत्रा किती भरली आहे,मंदिरात भाविकांची गर्दी आहे का,कोणते दुकान कुठे आहे,आपल्याला कोणती कोणती खेळणी घ्यायची आहेत,आपल्याला काय काय खायचे आहे हे सर्व पाहण्यासाठी.आणि रात्री आम्ही सर्व भावंडे आई-पपा ,काका-काकी बरोबर जात असू.आज आठवले तरी हसू येते.केवढे ते जत्रेचे आकर्षण होते.काळानुरूप जत्रेचे स्वरूप बदलले परंतु जत्रेची ओढ आजही मनी तितकीच आहे जेवढी लहानपणी होती.मंदिरावरील व जत्रेतील रोषणाई डोळे दिपवून टाकत असे.रात्री साधारण १० वाजता जत्रेत गेलो तर पहाटेच ३ किंवा ४ वाजताच घरी येत असू.जत्रेमध्ये सारख्या फेऱ्या मारून व फिरून पाय चांगलेच दुखत असत.

पूर्वी म्हणे आमच्या ह्या गावच्या जत्रेमध्ये गावातील मंडळी खूप छान छान नाटके करत असे.त्यानंतर काही वर्षे जत्रेमध्ये पडदावर चित्रपट दाखवले जायचे अशी आठवण माझे आई आणि पपा दोघेही सांगतात.खूप मज्जा यायची नाटके व चित्रपट बघायला असे ते सांगतात.तसेच गावकऱ्यांतर्फे जत्रेमध्ये चुलीवर मटण (बळी दिलेल्या बोकडाचे)केले जाते (अजूनही केले जाते)मग प्रत्येकाने आपल्या घरातील वाटी घेऊन जायचे मग ते प्रसाद स्वरूपात आपल्याला दिले जाते अशी आठवण माझी आई आवर्जून सांगते.नवीन लग्न झालेल्या जोडपांसाठी ही जत्रा खूप विशेष असते असे मानले जाते.

देवीच्या साक्षीनेच गावकरी जत्रेचा हा सारा रंग लुटतात व पुढच्या वर्षीही जत्रेला येण्याचा मनात संकल्प करून जत्रेतून घरी येतात.परंतु आपण घरी आलो तरी मन मात्र जत्रेमध्येच रेंगाळत असते कितीतरी वेळ.

- सुयश गावड