Monday, August 31, 2020

समुद्र



समुद्र

मी दहावीला असताना आमच्या शाळेचे हिरक महोत्सवी वर्ष होते.त्यानिमित्ताने शाळेत एका कार्यक्रमात लेखक मिलिंद बोकील ह्यांना बोलावले होते. नुकतीच त्यांची शाळा ही कादंबरी प्रकाशित झाली होती. त्यांचे भाषण ऐकून मी संपूर्ण भारावून गेलो होतो.त्यानंतर माझ्या दहावीच्या परीक्षेनंतर असलेल्या सुट्टीत त्यांची शाळा ही कादंबरी वाचली.मला खूप आवडली. अगदी त्यावेळेपासून मी त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात आहे. पुढे त्या कादंबरीवर आधारित नाटक व चित्रपट दोन्ही आले.तेसुद्धा मी बघितले.

बऱ्याच वर्षानंतर त्यांची समुद्र ही लघुकादंबरी नुकताच वाचली.अवघी ९० पानांची ही कादंबरी आहे.परंतु खूप सुंदर विषय लेखक मिलिंद बोकील ह्यानी हाताळला आहे.ह्या कादंबरीमधील नायक भास्कर व नायिका नंदिनी या समृद्ध जीवन व्यतीत करणाऱ्या आनंदी दाम्पत्याची ही कथा आहे.दोन दिवस सुट्टीसाठी म्हणून समुद्रकिनारी राहायला येतात.आणि नायिका नंदिनी आपल्या हातून झालेल्या चुकीची कबुली नायक भास्करला देते.

त्यानंतर नायक व नायिका ह्यांच्या मनातील भावांचे वर्णन लेखक मिलिंद बोकील ह्यानी खूप सुंदररीत्या केले आहे.समुद्राच्या सानिध्यात विलक्षणपणे उलगडत जाणाऱ्या त्यांच्या भावबंधाचा उत्कट प्रत्यय ह्या पुस्तकात दिसून येतो.जसे समुद्र आपल्या सर्वांना त्याच्यामध्ये सामावून घेतो तसे नायक भास्कर आपल्या पत्नीला म्हणजे नायिका नंदिनीला आपल्यामध्ये सामावून घेतो. म्हणून लेखक मिलिंद बोकील ह्यानी ह्या पुस्तकाला दिलेले समुद्र हे शीर्षक अगदी समर्पक आहे असे मला वाटते.

लेखक मिलिंद बोकील ह्यानी ह्या कथेमध्ये खूप सूक्ष्म बारकावांचे
वर्णन केले आहे जसे की नायक व नायिका सुट्टीसाठी आलेल्या रिसॉर्टचे,त्याबाजूलील असलेल्या समुद्र, त्याचा किनारा,डोंगर इत्यादी.हे वर्णन अनुभवण्यासाठी एकदा जरुर समुद्र ही लघुकादंबरी वाचा.शॉर्ट न स्वीट ह्या उक्तीप्रमाणेच आहे ही लघुकादंबरी.जमल्यास जरूर वाचा समुद्र.

- सुयश गावड

Sunday, August 30, 2020

शिवरायांचा आठवावा प्रताप


शिवरायांचा आठवावा प्रताप...

माझा मित्र केतन सावंत लिखित शिवरायांचा आठवावा प्रताप हे पुस्तक नुकतेच वाचले.केतन आणि माझी ओळख आम्ही सदगुरु श्री.अनिरुद्ध बापूंचे श्रद्धावान म्हणून झाली होती. बरीच वर्षे आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. आम्हा दोघांमध्ये एक सामायिक छंद होता तो म्हणजे वाचन.गुरुवारी बापूंच्या इथे भेटलो की आम्ही पुस्तके , शिवाजी महाराज ह्यावर बरीच चर्चा करीत असू. भेटला की नेहमी तो शिवाजी महाराजांवर भरभरून बोलत असे.त्यामुळे त्याचे शिवाजी महाराजांवरील प्रेम मला चांगलेच ठाऊक होते.

काही दिवसापूर्वी त्याने फेसबुकवर प्रसिद्ध केले की त्याने शिवाजी महारांजावर एक कादंबरी लिहिली आहे आणि त्या कादंबरीमधील छोटे छोटे लिखाणाचे तुकडे तो फेसबुकवर प्रसिद्ध करीत होता अगदी त्यावेळेपासून ह्या कादंबरीबद्दल उत्सुकता मनाला लागून राहिली होती आणि दिवसेंदिवस केतन ती उत्सुकता आणखीन ताणत होता रोज वेगवेगळी पोस्ट फेसबुकवर अपलोड करून. आणि अखेर प्रतीक्षा संपली. १२ ऑगस्ट २०२० ला दुपारी १२ वाजता पुस्तकाचे ऑनलाइन प्रकाशन झाले(लोकडोउन होते म्हणून ऑनलाइन ).

नक्की काय असेल ह्या पुस्तकामध्ये त्याची उत्कंठा होती.एवढे ठाऊक होते की छत्रपती शिवाजी महाराजांची अफजलखानाशी झालेली ऐतिहासिक भेट आणि महाराजांनी केलेला अफजल खानाचा वध ह्याचे वर्णन ह्या कादंबरीमध्ये वाचनास मिळणार आहे.ज्यादिवशी पुस्तक प्रकाशित झाले त्याच दिवशी मी अमेझॉनवर पुस्तकाची प्रत बुक केली.साधारण ८-१०दिवसांनी पुस्तक माझ्या हाती आले आणि त्याच्या पुढच्या २ दिवसात मी संपूर्ण वाचून काढले अगदी अधाशासारखे.

खरच छान पुस्तक लिहिले आहे केतनने.ह्या पुस्तकासाठी घेतलेली मेहनत त्याच्या लिखाणातून दिसून येते.केतनची साधी सरळ आणि सोपी पण थेट काळजाला हात घालणारी लेखनशैली मनाला भावली.त्याने लिहिलेल्या अनेक प्रसंगाचे सुंदर वर्णन व चित्रण ही ह्या कादंबरीची जमेची बाजू आहे असे मला वाटते.त्या सर्व प्रसंगाचे चित्र अगदी तंतोतंत आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.

मला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानशी झालेली भेट व महाराजांनी अफजल खानाचा केलेला वध एवढेच माहीत होते परंतु ह्या केतनने लिहिलेल्या कादंबरीमुळे समजले की जावळी खोऱ्याचे महत्त्व, जावळीचे वर्णन, जावळीचा इतिहास, अफझलखानला महाराजांनी जावळीमध्ये येणास कसे भाग पाडले आणि का भाग पाडले,खानास भेटण्यासाठी महाराजांनी केलेली पूर्वतयारी , त्यामागील रणनीती ,अफजल खानाने स्वराजात मांडलेला उच्छाद आणि असे अनेक पैलू मला ह्या कादंबरीमार्फत उलगडत गेले.खानाला ठार मारून जेव्हा महाराज राजगडी आऊसाहेब जिजाउना भेटतात त्याचे खूप सुंदर वर्णन ह्या कादंबरीमध्ये केले आहे.आणि आऊसाहेब शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या सैनाच्या पराक्रमाचे वर्णन करण्यासाठी शाहीर अज्ञानतदास ह्यांना स्वतः बोलावून एक पोवाडा लिहून घेतला होता हे ह्या पुस्तकाद्वारे मला प्रथमच समजत होते.एकंदरीत काय ह्या पुस्तकाला दिलेले नाव अगदी समर्पक आहे शिवरायांचा आठवावा प्रताप... प्रत्येकाने आवर्जून वाचावे असेच आहे हे पुस्तक.आपल्या महाराजांचा पराक्रम आणि प्रताप वर्णन करणारे पुस्तक.

केतन मित्रा खूप खूप धन्यवाद आणि अंबज्ञ हे पुस्तक लिहिण्यासाठी.अशीच छान छान आणि दर्जेदार पुस्तके लिहीत राहा आणि आम्हा वाचकप्रेमींसाठी अशीच मेजवानी देत राहा.

तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप अनिरुद्ध शुभेच्छा!!!

                    ।। जय जगदंब जय दुर्गे ।।

- सुयश गावड

Thursday, August 20, 2020

अष्टपैल्लू व्यक्तिमत्व

कधी थांबणार स्त्री-भ्रूण हत्या?

बीजमाता राहीबाई पोरे

अर्ध्यावरती डाव मोडला...

चेतनची शाळा

रंगभूमीवरून एग्झिट

पिंक सिटीतील उपक्रम आवडला

सेल्फी काढताना असावे भान

Thursday, August 13, 2020

मनाच्या झरोक्यातून


मनाच्या झरोक्यातून...

माझा मित्र व कवी गणेश भाऊसाहेब पोटफोडे ह्यांचा मनाच्या झरोक्यातून हा कवितासंग्रह नुकताच वाचनात आला. ह्या कवितासंग्रहात एकूण ५९ कविता आहेत आणि सर्वच कविता खूप भावपूर्ण व सुंदर आहेत.ह्या कवितासंग्रहावरून कवीच्या हळव्या मनाचे,माणूसकी जपणारा व निसर्गाची अनाम ओढ असणाऱ्या कवीचे दर्शन होते.मनाच्या झरोक्यातून,ओसरी वाडा,शाळेचे दप्तर,लेक आला माझ्या घरी,वाळवंटातील तुळस,वाळवंटातील श्रावण,मी खूप खूप शोधल तुम्हाला,प्रिय मित्रास,सोडला नसता गाव तर ह्या कविता माझ्या मनाला खूप भावल्या.

कवीची ओळख करून दयायची म्हणजे कवी गणेश भाऊसाहेब पोटफोडे मूळचे अहमदनगर जिल्यातील शेवगाव जवळच्या अमरापूर खेड्यातील.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम शिक्षण घेऊन कवी गणेश पोटफोडे सध्या दुबई येथे कामानिमित्त स्थित आहेत.कवीने ह्या कवितासंग्रहामध्ये सर्वच विषयांवर कविता लिहिल्या आहेत.त्यांच्या बालपणीच्या आठवणी अनेक कवितेत दिसून येतात व त्यांचे बालपण किती समृद्ध होते ते आपल्या त्यांच्या ह्या कवितांतून दिसून येते.त्यांच्या काही कवितेतून त्यांचे कवी मन मायदेशी ओढ घेत आहे ते दिसून येते.

कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये साहित्यिक डॉ.कैलास दौंड लिहितात की,ह्या कवितासंग्रहातील सर्वच कविता म्हणजे कवीचे भावचरित्र आहे.हे वाक्य कवी गणेश पोटफोडे ह्यांच्याबाबतीत तंतोतंत लागू होते.ह्या कवितासंग्रहातील सर्वच कविता वाचनीय व मनाला अनाम ओढ लावणाऱ्या आहेत असेही डॉ.कैलास दौंड म्हणतात ते अगदी आपल्या सामान्य मनाला पटण्यासारखे आहे.

शाळेचे दप्तर,चल जाऊ पोहायला ह्या कवितेतून तर अगदी हुबेहूब चित्र डोळ्यासमोर उभे राहते व कवीचे बालपण किती समृद्ध होते ह्याची प्रचिती येते.वाडा, ओसरी,मनाच्या झरोक्यातून ह्या कवितांतून तर कवीच्या अंतर्मनाच्या कप्प्याचे दर्शन होते . वाळवंटातील श्रावण,वाळवंटातील तुळस ह्या कवितेतून कवी वाळवंटातील व कवीच्या मनाला आलेला कोरडेपणा व रुक्षता दर्शवितो. आई व पैलतीरावरून ह्या कवितांतून कवी सातासमुद्रापार असणाऱ्या आपल्या आईबद्दल व आईसमान असणाऱ्या मातृभूमीबद्दल असणारी ओढ दिसून येते.कवी गणेश पोटफोडे ह्यानी निसर्गावरसुद्धा खूप छान कविता रचल्या. पहिला पाऊस,धबधबा,सूर्योदय,बगळा, धुके,चिऊताई ह्या त्यातील निवडक कविता.कोयता,फास,व्यथा शेतकऱ्याची ह्या कवितांतून कवीने शेतकरी व कष्टकरी ह्यांच्यावर पण प्रकाश टाकला आहे.मी खूप खूप शोधलं तुम्हाला ह्या कवितेत बाबांच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या मुलाच्या मनाची घालमेल वर्णन केली आहे.चटके,वैशाख वणवा ह्यांसारख्या कवितेतून आपल्याला पण उन्हाची लाही अनुभवता येते.सोडला नसता गाव तर ह्या कवितेत कवी आपली बाजू मांडत आहे जर त्याने योग्यवेळी गाव नसता सोडला तर त्याची काय अवस्था असती आज.

माझ्या परम मित्रा आणि कवी मन असणाऱ्या गणेश पोटफोडे ह्यांच्या कवितेच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!अश्याच छान छान कविता लिहीत रहा आणि आम्हाला तुझ्या कवितांची मेजवानी अशीच कायम देत रहा.

जाता जाता एकच सांगीन तेही तुझ्या प्रिय मित्रास ह्या कवितेतील ओळीतून...

हे माझ्या प्रिय मित्रा
माझ्या जीवनाची मेणबत्ती
संपूर्ण वितळाण्यापूर्वी
तुझी भेट व्हावी हीच इच्छा
नाहीतर ही मेणबत्तीची ज्योत
वाऱ्याअभावीही फडफडत राहील

- सुयश गावड

शाळेचं दप्तर

माझं शाळेचं दप्तर
होतं फार मजेशीर
पांढर्‍या खताच्या गोणीला
दोन बंध लावून शिवलेलं

त्यातच कोंबलेली असत
वह्या, पुस्तकं, लाकडी पट्टी
कोरे कागद, पॅड, रंगपेटी
आणि जेवणाचा डब्बा

ओमेगाच्या कंपास पेटीला
शिवलेला होता एक खिसा
कारण कंपास पेटीत
माझा फार जीव होता

वर्षात वह्या पुस्तकं बदलायची
पण कंपासपेटी तीच असायची
कंपास पेटीला आतून चिकटवलेली होती
दरवर्षीच्या ध्वज दिनाची तिकीटं

दप्तरात होती अजुन एक
खताची मोकळी पांढरी गोणी
स्वच्छ धुतलेली आणि
दाबून घडी करून ठेवलेली

वर्गात नव्हती बाकं तेंव्हा
आम्ही गोणी अंथरूणच बसायचो
पावसाळ्यात हीच गोणी
घोंगता करून वापरायचो

स्वतःला पावसात भिजायला
फार फार आवडायचं
पण दप्तर भिजल्यावर
फार वाईट वाटायचं

दप्तर जरी मळकटलेलं होतं
पण मला ते प्रिय होतं
कितीतरी वस्तूंनी भरलेल आसलं
तरी त्याचं कधी ओझं नाही वाटलं

एक दिवस शाळा संपली
ते कुठेतरी अडगळीत पडलं
पण मला अजूनही आठवतं
माझं 'शाळेचं दप्तर'

- गणेश पोटफोडे

वाळवंटातील श्रावण

श्रावणमासी या वाळवंटी
सूर्य नभीचा आग ओकतो
पन्नाशीवर चढवून पारा
आम्हास तो उभा भाजतो

ए सी घरातून बाहेर पडता
सर घामाची येते धावून
अंगाखांद्यावर ओघळून ती
इकडून तिकडे जाते भिजवून

छत्री असे जरी डोक्यावर
ढग घामाचा तरी गाठतो
गुपचूप अंगातून तो पाझरत
पाण्यासाठी कंठास दाटतो

आकाश निरभ्र असे निरंतर
वाळूस असे रान मोकळे
मृगजळी त्या खेळती पिंगा
क्षणात वाळूचे धुके झाकळे

सरते शेवटी श्रावणमासी
दुसरे कशाचे कौतुक नसे
पिकल्या गाभोळ्या खजूराचे
तेवढेच काय ते भाग्य असे

- गणेश पोटफोडे

आक्का


आक्का

मालती अनंत पाटील म्हणजे तुम्हा-आम्हा सर्वांची आक्का.काल दुपारी आपल्यातून निघून गेली.आणि मन एकदम भूतकाळात गेले.आबाल वृद्धांपर्यंत सर्वांचीच आक्का. आक्का म्हणजे प्रेमळ व शांत स्वरूप.आम्ही सुट्टीत गावी गेलो की आवर्जून भाई आणि आक्काला भेटायला बंगल्यात  जात असू.तेव्हा आक्का सर्वांचीच आपुलकीने विचारपूस करत असे ते आठवले.ते अगदी आत्तापर्यंत आजारी असतानासुद्धा तिला बघायला गेल्यावर आई 'पपा ताई भावजी ते छोट्या शौर्यपर्यंत सर्वांचीच ती विचारपूस करीत असे.आक्काचा हा स्वभाव मला खूप आवडायचा.तिला सर्वांबद्दलच आत्मियता.

आक्काचा प्रवास म्हणजे वरळी कोळीवाडा ते माटुंगा आणि नंतर परत गाव असा होता.आक्काने भाईंना खूप मोलाची साथ दिली आणि तिन्ही मुलांना उत्तम संस्कार.पपाकडून आक्काबदल खूप ऐकले होते.आक्काकडे मुंबईमध्ये खूप लोकांचा राबता होता आणि आक्का त्याच प्रेमाने सर्वांचे आदरातिथ्य करत असे.पपाना आक्का आणि भाईचा विशेष आदर होता.ते नेहमी त्यांच्या गोष्टी आम्हाला सांगत असे.आक्काच्या जाण्याने एक सुस्वभावी व सोज्वळ व्यक्तिमत्त्व हरपले.

आक्काला भावपूर्ण श्रद्धांजली!!!

Wednesday, August 12, 2020

पत्रास कारण की...



पत्रास कारण की...

ग्रंथाली प्रकाशन व अरविंद जगताप लिखित पत्रास कारण की..हे पुस्तक नुकताच वाचनात आले. अनेकांना व विविध विषयांवर लिहिलेल्या ह्या पत्रांचे एकत्रित करून तयार केलेले हे पुस्तक. झी मराठीवरील चला हवा येऊ द्या ह्या कार्यक्रमात अरविंद जगतापानी लिहिलेली पत्रे सागर कारंडे ह्या पोस्टमन काकानी कार्यक्रमात जाहीरपणे वाचली.ह्या कार्यक्रमातच ऐकताना ही पत्रे मला खूप आवडली व अरविंद जगताप ह्यांची लेखानशैलीसुद्धा.धन्यवाद झी मराठी व अरविंद जगताप ह्यांचे की त्यांनी ह्या सर्व पत्रांचे एकत्रिकरण करून त्याचे पुस्तक प्रकाशित केले.

पत्र तर खाजगी गोष्ट असते.एकट्याने वाचण्याची पण ही पत्र झी मराठीसारख्या खाजगी वाहिनीवर एका कार्यक्रमात जाहीरपणे वाचली गेली व प्रेक्षकांना ती आवडली.प्रत्येक पत्रामध्ये काही तरी उपदेश असायचा,लपलेला बोध असायचा व ती सर्व पत्र मनाला भावून जायची.प्रिय आई , प्रिय इंडिया उर्फ भारत देशा , दाभोलकरांच्या मारेकऱ्यांनो , सोशिक स्त्रियांनो , महाराष्ट्र धर्म वाढवावा , सचिन पिळगावकर ही त्यातील मला आवडलेली निवडक पत्रे. ह्या पुस्तकात एकूण ४७ पत्रे आहेत आणि सर्वच पत्र खूप वाचनीय  व छान आहेत.

आजकालच्या ह्या ई-मेल व मोबाईल मेसेजच्या दुनियेत पत्र ही संकल्पना केव्हाच आऊट डेटेड झाल्यासारखी वाटते.पण स्वतःच्या हाताने कोणालातरी पत्र लिहायचे त्यामागील प्रेम व भावना व्यक्त करण्याची सर ह्या ई-मेल व मोबाईल मेसेजना नाही  हे मी ठामपणे सांगू शकतो.आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या मोबाइल इमोजीसाचा आधार घ्यावा लागतो ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे.पत्र ही जोडणारी गोष्ट आहे.माझ्या मते पत्र ही प्रेम,भावना,दुःख,तक्रार,खंत,निषेध व्यक्त करण्याचे उत्तम साधन आहे.पत्र व पोस्टाची पेटी दोन्ही आपल्या मन पटलावरून गायब झाली आहेत.आणि ह्याच पत्रांना लेखक अरविंद जगतापानी नवं संजीवनी दिली असे मला वाटते. पत्र ही लोकांच्या सुख दुःखाचा दुवा होता जो आज इतिहास जमा झाला होता तो इतिहास अरविंद जगतापानी पुन्हा त्यांच्या ह्या पत्राद्व्यारे चालू केला.

अरविंद जगताप ह्यानी लिहिलेली ही पत्र वाचताना चेहऱ्यावर कधी हसू तर कधी डोळ्यांमध्ये आसू येतात.काही पत्रांमध्ये त्यांनी मारलेली कोपरखळी ह्याचा तर आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.कोणे एकेकाळी पत्र  जगण्याचे बळ होते.कारण एका नवऱ्याने आपल्या बायकोला लिहिलेले पत्र असो की,एका आई बापाने होस्टेलवर राहून शिकत असलेल्या आपल्या मुलाला लिहिलेले पत्र असो की, एका नवविवाहित मुलीने आपल्या माहेरी असलेल्या आईला लिहिलेले पत्र असो की,एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला लिहिलेले पत्र असो सर्वाच्या भावना जरी वेगळ्या असल्यातरी त्यातील एक सामायिक दुवा पत्र हा एकमेव होता.पत्र जगण्याचा आधार होता कितीतरी जीवांचा.

संदेशे आते हैं
हमें तड़पाते हैं
तो चिट्ठी आती है
वो पूछे जाती है
के घर कब आओगे
के घर कब आओगे
लिखो कब आओगे
के तुम बिन ये घर सूना सूना है

बॉर्डर ह्या चित्रपटातील हे गाणे पत्राचे महत्व अचूक अधोरेखित करते.पूर्वी कितीतरी सैनिक्यांच्या बायकाचे फक्त ह्या पत्राच्या भरवश्यावर आपल्या संसाराचे व जगण्याचे बळ निर्धारित असायचे.

लेखक अरविंद जगताप ह्यांचे आभार त्यांनी खूप सुंदर पत्रे व पत्रांचे महत्त्व आमच्या पिढीला पटवून दिल्याबद्दल. पत्रास कारण की....हे पुस्तक प्रत्येकाने जरुर वाचावे.

- सुयश गावड